
“चंद्रपूरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राज्यमंत्री नाईक संतापले”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, चंद्रपूर
शहरातील रस्त्यांची दुरावस्था बघून ‘रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते’ या शब्दात राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
तसेच रस्त्यांची अर्धवट कामे तत्काळ पूर्ण करावी आणि ताबडतोब खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले. राज्यमंत्री नाईक यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागाचा आढावा घेतला.
यावेळी बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, अक्षय पगारे, जया ठाकरे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, प्रणीव लाटकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या, एम.आय.डी.सी. चे प्रादेशिक अधिकारी निशांत गिरी, जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, ग्रामीण अध्यक्ष नितीन भटारकर उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यमंत्री नाईक म्हणाले, या जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची संख्या मोठी आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या बेरोजगार अभियंत्यांना कामे देत नसल्याच्या ब-याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अभियंत्यांना नियमानुसार कामे द्यावीत. यापुढे काम मिळाले नाही अशा तक्रारी येता कामा नये अशी सूचना केली.
तसेच चंद्रपूरमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट असून बहुसंख्य ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खाड्डे पडले आहेत. तेव्हा प्राधान्याने रस्त्यावरील सर्व खाड्डे बुजवावीत अशी सूचना केली.
आदिवासी विकास विभागाने लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार पात्र उमेदवारांना त्वरीत नियुक्ती द्यावी. याबाबत कोणतीही टाळाटाळ करू नये. चंद्रपूर हा उद्योगांचा जिल्हा आहे.
उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडवाव्यात. तसेच स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण ठेवावे, अशा सुचना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केल्या.





