
“महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात १७ हजार जागांसाठी मेगाभरती”
वमहाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, मुंबई
एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) लवकरच कंत्राटी पद्धतीने १७,४५० चालक व सहायकांची भरती करणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या ८ हजार नवीन बसेससाठी हे मनुष्यबळ आवश्यक आहे.
येत्या २ ऑक्टोबरपासून यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार असून, कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या उमेदवारांना सुमारे ३० हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३००व्या संचालक मंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आले. बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहायक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्षे कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे.
ही ई-निविदा प्रक्रिया ६ प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहायक उमेदवाराला सुमारे ३० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
याबरोबरच उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे होतकरू तरुण-तरुणींनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन सरनाईक यांनी केले.
महामंडळातील बसेसची वाढती संख्या व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला.
एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला २०२४ पर्यंत मनाई केली होती.
येत्या काही वर्षांत एसटीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.येत्या पाच वर्षांत नव्या २५ हजार बसगाड्या एसटी ताफ्यात दाखल होणार आहेत.
या बसगाड्या सेवेत आणण्यासाठी चालक-वाहकांसह आणि अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. महामंडळात २०१५-१६ मध्ये १ लाख ८ हजार मनुष्यबळ होते. सध्या ही संख्या ८७ हजार असून यात ३८ हजार चालक आणि ३४ हजार वाहकांचा समावेश आहे.
एसटीच्या ताफ्यात एकूण १५,७७४ बसगाड्या आहेत. यातील स्वमालकीच्या १४,९९३ आणि भाडेतत्त्वावरील ७८१ गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत.
कंत्राटी भरतीमुळे मनुष्यबळाची कमतरता भरून निघेल आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.





