
“१४ दिवसानंतरही चौकशी समिती आर्वीत पोहचलीच नाही”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, वर्धा
आर्वी पंचायत समितीतील मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर यांनी काहींना हाताशी घेत कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आर्वीच्या गटविकास अधिकार्यांनी प्राथमिक चौकशी केली. त्यांच्या चौकशीत केवळ २५ लाख २८ हजार ३१९ रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचे सांगण्यात आले.
तर २५ ऑगस्ट २०२५ च्या आदेशान्वये जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत केली.
पण १४ दिवसांचा कालावधी लोटूनही चौकशी समितीतील अधिकार्यांनी आर्वी गाठून चौकशीला सुरुवात केली नसल्याने ही समिती कागदी घोडा ठरत आहे.
समुद्रपूर येथील गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे यांच्या अध्यक्षतेत गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चौकशी समितीत एक लेखा अधिकारी, प्र. सहा. गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (नरेगा), सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (नरेगा), समन्वयक तर एका सहाय्यक कार्यक्रम अधिकार्यांचा समावेश आहे.
सखोल चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आलेली ही समिती आर्वी पंचायत समिती गाठून झालेल्या अपहाराबाबतची अधिकची माहिती घेऊन अपहारास कोण-कोण जबाबदार आहे, नेमकी अपहाराची रकम किती हे पुढे आणेल, अशी अपेक्षा आहे. पण, चौकशी समितीतील अधिकारी अद्याप आर्वी पंचायत समिती कार्यालयात पोहोचले नसल्याने समितीवर कुणी दबाव तर आणत नाही ना, अशी चर्चाही आता अधिकार्यांसह नागरिकांमध्ये रंगत आहे.
आर्वी येथील अपहार प्रकरण गंभीर असल्याने ते कायदेशीर फौजदारी कारवाईसाठी पोलिस विभागाकडे वळते होणे क्रमप्राप्त आहे. पण अद्यापही ना पंचायत समिती ना जिल्हा परिषद प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली आहे. आर्वी पंचायत समितीतील मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून बडतर्फ केले आहे.
जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून मनरेगा एपीओला बडतर्फ करण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.





