
“राज्यातील एसटी बस आगारांचा १३ हजार एकर भूखंड ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देणार”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, मुंबई
राज्य परिवहन मंडळाच्या राज्यातील बस आगारांचा सुमारे १३ हजार एकर भूखंड ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यासाठी पुढील महिन्यात निविदा काढण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी सांगितले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’च्या (नरेडको) महाराष्ट्र विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ या तीन दिवसीय मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन सरनाईक यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
प्रसिद्ध अभिनेते आणि रग्बी इंडियाचे अध्यक्ष राहुल बोस, नरेडको इंडियाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी हे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे मुंबईतील कुर्ला, बोरीवली आणि राज्यातील इतर शहरांमध्ये मिळून १३ हजार एकरांहून अधिक भूखंड आहे. हे भूखंड व बस आगार विकसित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
बस आगार आता ३० वर्षांऐवजी ९८ वर्षांच्या दीर्घकालीन भाडेपट्ट्याने दिले जातील. गुजरातमध्ये ज्या पद्धतीने बस आगार विकसित केले आहेत, त्याप्रमाणे ही बस आगारे पोर्टमध्ये विकसित केली जातील असेही सरनाईक यांनी सांगितले. राज्यातील विकासकांनी या प्रकल्पात सहभागी व्हावे, असे आव्हान त्यांनी केले.
बांद्रा-कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी लवकरच सुरू होणार असून त्याचा विस्तार मीरा-भाईंदर आणि ठाणेसह मुंबई महानगर प्रदेशात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गरजूंसाठी कमी किमतीत घरे पुरवावीत आणि सर्व उत्पन्न गटांना सोयीस्कर अशी सामुदायिक ठिकाणे निर्माण करून मुंबईसारख्या आव्हानात्मक शहरी वातावरणात सुखकर जीवन अनुभवता येईल, यासाठी नियोजन करावे, असे आवाहन राहुल बोस यांनी केले.





