
“अधिकारी-कर्मचारी संघटना एकवटल्या-लेखणीबंद आंदोलन”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले होते . या निर्णयाविरोधात कर्मचारी संघटना आणि अधिकारी एकवटल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यातील अन्न विभागातील प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. कोणतेही सबळ कारण नसताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलेली कारवाई ही अपमानास्पद आहे.
म्हैसूर येथील अहवालानंतर कारवाई केली असती तर चालले असते. मात्र, माहिती न घेता केलेल्या कारवाई विरोधात सर्व कर्मचारी संघटना एकवटल्या असून, निलंबन मागे न घेतल्यास हा लढा तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी यावेळी दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील व्यापारी महेश व रमेश तंवर यांच्या दुकानात अप्रमाणित तेलाचे साठे आढळले. याप्रकरणी नाशिक विभागाचे सह आयुक्त महेश चौधरी व नंदुरबार जिल्ह्याचे सहा. आयुक्त संदीप देवरे आणि आनंद पवार यांचे निलंबन करावे, असे आदेश मंत्री झिरवाळ यांनी विधिमंडळात दिले.
याप्रकरणी आमदार आमशा पाडवी यांनी प्रश्न विचारला होता त्यानुसार ही कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे. नंदुरबार जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार यांनी १० मार्च रोजी महेश व रमेश तंवर यांच्या दुकानावर छापा टाकून रिफाइन सोयाबीन व शेंगदाणा तेलचे नमुने घेतले होते. हे नमुने ११ मार्च २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या नमुन्यांचा अहवाल ९ मे रोजी नंदुरबार कार्यालयाला प्राप्त झाला. यामध्ये दोन्ही नमुने हे अप्रमाणित असल्याचे कळवण्यात आले.
नंदुरबार कार्यालयाने हे नमुने अप्रमाणित असल्याचे संबंधित दुकानदाराला कळविले. दरम्यान, ४ जून रोजी त्यानुसार हे दोन्ही नमुने फेरविश्लेषणासाठी म्हैसूर येथील सेंन्ट्रल फुड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आले होते.याचा अहवाल येण्यापूर्वीच संबंधितांना निलंबित करण्यात आले म्हणून हे लेखनी बंद आंदोलन छेडण्यात आले आहे असे बोलल्या जात आहे.