
“माणिकराव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
मानोरा तालुक्यातील फुलउमरी, भुली, माहुली, विठोली सह इतर गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे केंद्रीय सदस्य माणिकराव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली. पिकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून बाधीत शेतकऱ्यांना धीर दिला.
शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शेतकऱ्यांना आश्वासीत केले.
बुधवारी आकांक्षित वाशिम जिल्ह्यातील अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. तिथे सोयाबीन, कापूस, संत्रा फळबाग पिकांची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासनाने सततचा संततधार व ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे पाण्याखाली आलेल्या पिकांचे पंजाबच्या धर्तीवर मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी, सरसकट शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ द्यावा आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या शेतमजुरांना खावटीची मदत दिवाळी पुर्वी देण्याची मागणी करणार असल्याची बाधीत शेतकरी व शेतमजुरांना आश्वासन दिले.
जिल्हाध्यक्ष, प्रदेश सचिव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्षासह, काँग्रेस पक्षाचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते व बाधित क्षेत्रातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.





