
“राज्यात 1183 जिल्हा परिषद कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा घेतला लाभ”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेत अनेक सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी लाभ घेतल्याचे सांगितले जात होेते. चौकशीत ही बाब खरी ठरली आहे. राज्यात जवळपास 1183 जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
एका घरातील दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल अशी अट आहे. मात्र दोन पेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला. अशा महिलांची यादी सरकारने तयार केल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार राज्यातील तब्बल 26 लाख महिलांची यादी तयार करण्यात आली.
या महिलांची पडताळणी करण्याचे काम जोरात सुरू आहे. अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी घरोघर फिरून या लाभार्थ्यांची पडताळणी करत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत राज्य सरकारच्या कक्ष अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या सीईओंना अशा बोगस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.
लाडकी बहीण योजनेत लाडके भाऊ, 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, याआधीही जवळपास अडीच हजार महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा असाच प्रकार समोर आला आहे. तसेच 14 हजार पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देशच आता कमकुवत होऊ लागला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची सुरूवात करण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच अनेक त्रुटी राहून गेल्या होत्या. योजनेचे निकष तयार केलेले असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अर्ज भरून घेताना कर्मचाऱ्यांनी योग्य पडताळणी केली नाही, सरसकट अर्ज मंजूर केले. त्यामुळे योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढली. आता या लाभार्थ्यांची पडताळणी करून त्यांचा लाभ बंद करण्यात येत आहे. या कार्यवाहीमुळे योजनेतील लाभार्थ्यांची संख्या घटत चालली आहे.
14 हजार पुरुषांनी घेतला लाभ
राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. योजना फक्त महिलांसाठी असताना या योजनेत चक्क पुरुष लाभार्थी सापडले आहेत. जवळपास 14 हजार 218 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेंतर्गत या पुरुष लाभार्थ्यांना 21.44 कोटी रुपयांचे वाटपही झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अशा बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जातील. जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.